दैनिक, हिंदू जागर | विशेष रिपोर्ट
मुख्य संपादक : रोशन ठाकुर, वर्धा
वर्धा : भरत नागपाल यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण परिसर हादरलेला असतानाच, या घटनेनंतर समाजमाध्यमांवर सुरू झालेला विकृत जल्लोष हा केवळ संतापजनक नसून, संपूर्ण समाजाला हिंसेकडे ढकलणारा अत्यंत धोकादायक प्रवाह ठरत आहे. “जे झालं ते बरं झालं”, “एक कमी झाला”, “तो भाजपवाला होता म्हणून मेला”, अशा थेट आणि निर्लज्ज शब्दांत काही लोक खुलेआम हत्येचं समर्थन करत आहेत.
हा फक्त शब्दांचा खेळ नाही हा माणुसकीच्या मरणाचा जल्लोष आहे.
आज भरत नागपाल यांच्या हत्येवर काही जण स्वतःला मोठे विचारवंत, निर्भीड आणि प्रखर राजकीय कार्यकर्ते समजून उघडपणे आनंद व्यक्त करत आहेत. पण वास्तवात हे लोक हत्येचे अप्रत्यक्ष भागीदार बनत चालले आहेत, याची त्यांना जाणीवही नाही.
कारण आज खून कुणाचा झाला, हा मुद्दा दुय्यम बनवून, “तो कोणत्या पक्षाचा होता” हा मुद्दा केंद्रस्थानी आणला जात आहे.
या प्रकरणात काही जण जाणीवपूर्वक भरत नागपाल यांची ओळख थेट भारतीय जनता पार्टी शी जोडून, त्यांच्या मृत्यूला जणू राजकीय विजय ठरवत आहेत. उद्या काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी किंवा अन्य पक्षाचा कार्यकर्ता मारला गेला, तर त्याच्यावरही असाच जल्लोष होणार का? मग गुन्हेगार आणि सोशल मीडियावरून खून योग्य ठरवणारे यांच्यात नेमका फरक काय?

आज बामर्ड्यात केवळ एका व्यक्तीचा खून झालेला नाही, तर एका कुटुंबाचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त झालं आहे.
त्या आईचा काय दोष, जिने आपल्या कर्तबगार मुलाच्या भविष्यासाठी आयुष्य घालवलं? त्या भावाचं काय, जो लक्ष्मणासारखा आयुष्यभर भावाच्या पाठीशी उभा राहणार होता? त्या पत्नीचं काय, जिचा संपूर्ण संसार एका क्षणात राख झाला? आणि त्या गोड, निष्पाप लहान मुलांचं काय, ज्यांना आता आयुष्यभर “बिनबापाचे” म्हणून ओळखलं जाणार आहे?
हे सगळे प्रश्न कुणालाच महत्त्वाचे वाटत नाहीत का?
फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इतर माध्यमांवर बसून काही लोक निर्लज्जपणे लिहित आहेत. “तो अमुक पक्षाचा होता, म्हणून बरं झालं.” हा विचार केवळ राजकीय द्वेषाचा नाही, तर थेट हिंसेला वैध ठरवणारा विचार आहे.
आज जर एखाद्याचा खून त्याच्या राजकीय ओळखीवरून योग्य ठरवला जात असेल, तर उद्या जात, धर्म, भाषा किंवा विचारधारेवरून लोकांना संपवण्याची मानसिकता तयार होण्यासाठी किती वेळ लागणार आहे?
समाजाने हे गंभीरपणे ओळखलं पाहिजे
आज हत्येचा निषेध करण्याऐवजी, काही लोक आरोपी शोधण्याऐवजी, मृत व्यक्तीचा राजकीय शिक्का शोधण्यात मश्गूल आहेत. हेच तर सर्वात भीषण वास्तव आहे.
भरत नागपाल हे केवळ “भाजपचे नाव” नव्हते. ते एका आईचे जग होते, एका पत्नीचा आधार होते, एका भावाचे बळ होते आणि दोन लहान मुलांचे संपूर्ण विश्व होते. त्यांचा मृत्यू म्हणजे एखाद्या पक्षाचं नुकसान नव्हे तो एका कुटुंबाच्या आयुष्याचा कायमचा शेवट आहे.
आज हत्येच्या समर्थनार्थ लिहिल्या जाणाऱ्या प्रत्येक कॉमेंटमागे एक विकृत समाधान दडलेलं आहे. पण त्या एका ओळीमुळे त्या कुटुंबाच्या जखमेवर मीठ चोळलं जातं, याची जाणीव या तथाकथित विचारवंतांना नाही.
आज समाजाला कठोरपणे ठरवावं लागेल आपल्याला गुन्हेगारांच्या बाजूने उभं राहायचं आहे की पीडित कुटुंबाच्या?
आज दोषींना अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे. पण त्याचबरोबर, हत्येचं समर्थन करणाऱ्या या विकृत मानसिकतेलाही समाजाने ठाम नकार दिला पाहिजे.
कारण आज भरत नागपाल गेले… उद्या कोण?
हा प्रश्न आता फक्त बामर्ड्याचा राहिलेला नाही तो संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेचा आणि माणुसकीच्या अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे.










