वर्धा : जीवन-मरणाच्या क्षणी वेळच सर्वात मोठा घटक असतो… पण अनेक गरीब कुटुंबांसाठी त्या वेळेपेक्षा मोठा अडथळा ठरतो तो म्हणजे पैसा! एखादा अपघात, अचानक आजारपण किंवा गंभीर स्थितीत रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी ॲम्बुलन्सची गरज भासते… पण त्याच वेळी “किती पैसे लागतील?” हा प्रश्न समोर येतो आणि अनेक कुटुंबे त्या प्रश्नासमोर हतबल होतात. हीच ती कटू वास्तवता आहे जिथे काही वेळा ॲम्बुलन्स उशिरा मिळते… काही वेळा मिळतच नाही… आणि काही वेळा केवळ पैशाअभावी उपचार सुरू होण्याआधीच एखादा जीव निसटतो. समाजात रोज घडणाऱ्या या घटनांनी अनेकांना अस्वस्थ केलं… पण त्या अस्वस्थतेला कृतीत बदलण्याचा निर्धार केला तो सौ. काजल रोशन ठाकूर यांनी.
गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या मनात एकच विचार सतत फिरत होता आपल्या भागात अशी एक ॲम्बुलन्स सेवा असावी जी पूर्णपणे मोफत असेल… जिथे कोणत्याही गरीबाला पैशासाठी थांबावं लागणार नाही… आणि जिथे मदत ही व्यवहार न होता माणुसकी म्हणून दिली जाईल. ही भावना केवळ मनात न ठेवता आता प्रत्यक्षात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच आपुलकी फाउंडेशनच्या माध्यमातून एक मोफत ॲम्बुलन्स सेवा सुरू केली जाणार आहे. ही सेवा कोणत्याही प्रकारच्या नफ्यासाठी किंवा व्यवसायासाठी नसून, ती पूर्णपणे समाजसेवेच्या उद्देशाने उभी केली जात आहे.
या ॲम्बुलन्ससाठी कोणताही चार्ज आकारला जाणार नाही… कोणतीही फी घेतली जाणार नाही… कोणतीही अट ठेवली जाणार नाही. गरज असलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत वेळेत पोहोचणे आणि त्याचा जीव वाचवणे हेच या सेवेमागचं एकमेव ध्येय असेल. आजच्या काळात आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात पैशांवर अवलंबून झालेली आहे. ॲम्बुलन्स सेवा देखील अनेक ठिकाणी महागडी आणि सर्वसामान्यांना न परवडणारी ठरत आहे. अशा परिस्थितीत काजल रोशन ठाकूर यांचा हा निर्णय समाजासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरणार आहे. ही ॲम्बुलन्स केवळ एक वाहन नसेल… ती असेल संकटात धावणारी माणुसकी… ती असेल गरीबांसाठी आधार… ती असेल त्या प्रत्येक घरासाठी आशेची किरण, जिथे आजपर्यंत पैशाअभावी मदत मिळत नव्हती.
या उपक्रमातून एक ठोस संदेश दिला जात आहे – समाज बदलण्यासाठी मोठी पदं, सत्ता किंवा संपत्ती आवश्यक नसते… तर गरज असते ती फक्त मनात असलेल्या खरी माणुसकीची आणि इतरांसाठी काहीतरी करण्याच्या इच्छेची. लवकरच ही सेवा वर्धा जिल्ह्यात सुरू होणार असून, अनेक गरजू आणि रुग्णांसाठी ही ॲम्बुलन्स जीवनदायी ठरणार आहे. आज एका स्त्रीच्या मनातील संवेदनशील भावना उद्या हजारो लोकांच्या जीवाला आधार देणार आहे. हीच या उपक्रमाची खरी ताकद आहे.
आपुलकी फाउंडेशन – नावात आपुलकी आणि कामात माणुसकी! ❤️