वर्धा : पुलगाव येथील उद्योजक व भाजपाचे पदाधिकारी भरत नागपाल यांच्या निर्घृण हत्येने संतप्त झालेल्या नागरिकांनी वर्धा शहरात मूक विरोध मोर्चा काढून प्रशासनाला धडक दिली. या मोर्चातील सर्वात हृदयद्रावक दृश्य म्हणजे भरत नागपाल यांचा अवघा दोन वर्षांचा मुलगा वेदराज. हातात “माझ्या बाबांच्या खुनींना फाशी द्या” असा फलक आणि डोळ्यात अश्रू घेऊन तो मोर्चात सहभागी झाला होता. चिमुकल्या वेदराजची ही वेदनादायी हाक पाहून उपस्थित नागरिकही भावूक झाले.
चंद्रपूर जिल्ह्यातील बांबर्डा येथील वाळू घाटावर होळीच्या पूर्वसंध्येला कट रचून भरत नागपाल यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात वरोरा पोलिसांनी आतापर्यंत बारा आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे. मात्र या घटनेमुळे विदर्भात संतापाची लाट उसळली आहे.
या पार्श्वभूमीवर वर्ध्यातील नामदेव मठ येथून मूक विरोध मोर्चा काढण्यात आला. शहरातील मुख्य मार्गाने निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चेकऱ्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात यावा आणि खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी केली.
या मोर्चात भरत नागपाल यांचे भाऊ दिनेश नागपाल आणि राम नागपाल यांच्यासह कुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिनेश नागपाल यांनी प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी करत “आरोपींना तात्काळ शिक्षा झाली पाहिजे, अन्यथा न्यायासाठीचा लढा आणखी तीव्र केला जाईल,” असा इशाराही दिला.
मोर्चात महिलांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. पंजाबी समाज, मित्रपरिवार आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्तेही भरत नागपाल यांना न्याय मिळावा या मागणीसाठी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.
दरम्यान, भरत नागपाल यांच्या हत्येचे पडसाद राज्याच्या विधानसभेतही उमटले आहेत. मात्र न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केला. दोन वर्षांच्या वेदराजच्या डोळ्यातील अश्रू आणि बाबांसाठी न्याय मागणारी त्याची हाक मात्र प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेली.