दैनिक, हिंदू जागर
प्रतिनिधी : दिनेश घोडमारे
सिंदी (रेल्वे) : नगर परिषद सिंदी रेल्वेची २ मार्च रोजी झालेली सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली. प्रभाग क्रमांक १ च्या काँग्रेस नगरसेविका जयश्री रणजीत मडावी यांनी जनहिताच्या प्रश्नांवरून सत्ताधारी आणि प्रशासनाला धारेवर धरत आक्रमक पवित्रा घेतला. जमिनीचे पट्टे, मालमत्ता हस्तांतरण आणि उड्डाणपुलाची स्वच्छता या मुद्द्यांवरून सभेत मुख्याधिकारी आणि नगरसेविका यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.
सभेत विषय क्रमांक ५ वर चर्चा करताना जयश्री मडावी यांनी ३०-४० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना जमिनीचे पट्टे देण्याची मागणी लावून धरली. मात्र, सर्व जमिनींचे पट्टे देता येणार नाहीत, अशी भूमिका मुख्याधिकाऱ्यांनी घेतल्याने वाद निर्माण झाला. मडावी यांनी २०११ पूर्वीच्या शासन निर्णयाचा दाखला दिला असता, प्रशासनाने जीआर मिळाला नाही असे उत्तर दिले. पट्ट्याअभावी शबरी, रमाई आणि पंतप्रधान आवास योजनेचा निधी दरवर्षी परत जात असल्याबद्दल मडावी यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
मालमत्ता हस्तांतरणासाठी पूर्वी केवळ १०० रुपयांच्या स्टॅम्पवर होणारी प्रक्रिया आता १,००० रुपये आकारून आणि सेलू येथून रजिस्ट्री करण्याची सक्ती का केली जात आहे? असा सवाल मडावी यांनी उपस्थित केला. प्रशासनाने नियम बदलले आहेत असे सांगून हात झटकल्याने नागरिकांमधील नाराजीला मडावी यांनी सभेत वाचा फोडली. प्रभागातील रस्ते, नाली आणि विशेषतः उड्डाणपुलाच्या स्वच्छतेबाबत विचारणा केली असता, उड्डाणपुलाची स्वच्छता नगरपरिषदेच्या अखत्यारीत येत नाही, असे अजब उत्तर मुख्याधिकाऱ्यांनी दिले. यावर मडावी यांनी उपोषणाचा इशारा दिला असता, उपोषणाला बसता येत नाही असा नियम सांगून प्रशासनाने त्यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला.
उड्डाणपुलावरील पथदिवे मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाने बंद असल्याचे समोर आले, ज्यामुळे संताप व्यक्त होत आहे. जनहिताच्या प्रश्नांवर सत्ताधारी पक्ष ‘मूग गिळून’ गप्प असल्याने मडावी यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. शहरात स्वच्छता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मडावी यांनी दिला आहे. या सभेला मुख्याधिकारी पौर्णिमा गावित, नगराध्यक्षा राणी कलोडे, उपाध्यक्ष अकिल शेख, विरोधी गटनेता अजय कलोडे आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते. आता नगरसेविकेच्या या आक्रमक पवित्र्यानंतर प्रशासन नेमकी काय पावले उचलते, याकडे सिंदीकरांचे लक्ष लागले आहे.
नगरपरिषदेची सभा ही जनतेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी असते, केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी नाही. प्रभाग क्र. १ मधील नागरिक जमिनीच्या पट्ट्यांसाठी आणि मूलभूत सोयींसाठी कित्येक दिवसांपासून वाट पाहत आहेत. मात्र, प्रशासन नियमांचे तांत्रिक बोट दाखवून सामान्यांची अडवणूक करत आहे.
जयश्री मडावी
नगरसेविका (काँग्रेस) प्रभाग क्रमांक १.











